वेगळी वाट
डिसले गुरुजी संदर्भात 'सिस्टीमला
न झेपलेली प्रतिभा' लेख वाचला अन् मन खिन्न झाले. अश्या अनेक
'प्रतिभा' राज्यात आहेत, पण त्या माध्यमांद्वारे समोर आलेल्या नाहीत. म्हणून त्या चर्चेत आल्या
नाहीत आणि आपणास माहिती नाही.
असे शासनाच्या कडक 'नियमांना' बळी
पडलेले अनेक छोटे-मोठे शिक्षक आजही राज्यात आहेत. त्यापैकी काहींनी राजीनामा दिला,
काहींना राजीनामा द्यायला भाग पाडले, काहींची
एकदम दूर गैरसोयीच्या ठिकाणी बदली करण्यात आली, काहींना
नोकरीवरून काढून टाकले तर काहींनी हार मानून प्रवाहासोबत इतरांप्रमाणे कार्य
करण्याचा मार्ग निवडला.
या अनुषंगानेच एक सत्य घटना...
केंद्र सरकारने सात वर्षांपूर्वी राज्यात एक योजना
आणली होती. प्रायोगिक तत्वावर सुरु केलेली ही व्यवसाय प्रशिक्षण देण्याची योजना, राज्यातील
सर्व सरकारी शाळेत सुरू केली.
यात दोन तास शिकविण्यासाठी कंत्राटी शिक्षक भरती
केले. राज्यात सुमारे आठशे शिक्षक योजनेत शिकवू लागले.
सुनील पाटील त्यातील एक शिक्षक. वर्षातून
फक्त काही महिने तुटपुंजा पगार घेत तन-मन-धनाने अगदी जीव ओतून काम करणारा. मुलांना
अगदी मन लावून शिकविणारा.
2-3 वर्षातच त्याच्या कामाचे कौतुक परिसरात होऊ
लागले. त्याने विविध प्रयोग, उपक्रम शाळेत राबविले. अनेक
विशेष बक्षिसे त्याला मिळाली. हळू हळू त्याचे परिणाम राज्यभर दिसू लागलेत. नाशिक,
मुंबई, पुणे, दिल्ली
येथून लोकांची शाळा भेट देण्यास सुरुवात झाली. भेटीस येणारे काही शिक्षक, काही अधिकारी फोटो काढू लागलेत, काही व्हिडीओ शूटिंग
करु लागले. त्याचा परिणाम असा झाला की, विविध मासिकात स्टोरी
प्रसिध्द झाल्यात, टीव्ही वर कार्याचे प्रसारण झाले, कौतुक झाले. पण हे सर्व सोबतच्या काही जणांना तसेच अधिकारी यांना सहन झाले
नाही. त्यांनी सुनीलला विरोध, टीका, त्रास
देण्यास सुरुवात केली.
राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय अनेक बक्षिसे
मिळविणारा सुनील त्याच्या कामात मग्न असताना, इकडे सर्व जण एकत्र येत दोन
वर्षांच्या सर्वांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर त्यांना या कामी यश आले आणि वर
उल्लेख केलेल्या चौथ्या गटात सुनीलचा समावेश झाला, तब्बल पाच
वर्षांनंतर सुनीलला कोणतेही कारण न देता नोकरीवरून काढून टाकण्यात त्यांना यश आले.
सुनीलला 'बेरोजगार' करून सर्वांनी आनंद
साजरा केला.
डिसले गुरुजी, युवराज घोगरे, वारे गुरुजी, पाटील सर असे अनेक गुरुजींच्या उमेदीचे
पंख छाटण्यात अखेर यश आले.
शिक्षक म्हणजे समाजाला
आकार देणारा, मुलांना घडविणारा एक कारागीर. त्यांच्या
वाट्याला अशी उपेक्षा यावी. कधी समाजामुळे, कधी सिस्टीममुळे
आणि कधी सोबतींमुळेच!
गोरगरिबांच्या लेकरांना योग्य मार्ग दाखवून, आदर्श
कार्य करणाऱ्या, इतरांपेक्षा 'वेगळी
वाट' निवडणाऱ्या शिक्षकाला असे सिस्टीमच्या बाहेर फेकले
जाते. अन यावर इतर शिक्षक, समाज निमूटपणे हे सर्व मान्य
करतो... जाणूनबुजून आपल्या डोळ्यावर पट्टी
बांधल्यासारखे वागतो? का? गुरुजीच जर
असा खचतोय तर विद्यार्थ्यांचे काय?
आजही अशा कितीतरी सावित्री आणि ज्योतिबा लढत
आहेत आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी.... समाज आणि सिस्टीम जाऊ द्या हो पण 'आपण' तरी
असं नको करायला. एखादा करतोय वेगळं कार्य, नवनवीन उपक्रम तर
त्याला ते करु द्या ना. आपण प्रोत्साहन देऊ या त्यांना? किमान
नाही मदत तर....
तात्पर्य:
…. ज्याला कुणाला 'वेगळी वाट' निवडायची आहे...
.... त्याने व्यवस्थेबाहेर जाण्याची
तयारी ठेवावी.